पुणे जिल्ह्यातील “या” गावातील शेतकऱ्याला कोथिंबिरीने केलं मालामाल,पिकाला आधुनिकतेची जोड देत घेतलं २१ लाखांचं उत्पन्न

पुणे जिल्ह्यातील “या” गावातील शेतकऱ्याला कोथिंबिरीने केलं मालामाल,पिकाला आधुनिकतेची जोड देत घेतलं २१ लाखांचं उत्पन्न

पुणे

पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पावसाच्या संततधारेमुळे शेतकऱ्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांची हाताशी आलेली पिके वाहून गेली. मात्र शिरूर तालुक्यातील खंडाळे गावच्या शेतकऱ्याने आपल्या शेतीत कमाल करत कोथिंबीरीच्या साडेसहा एकर क्षेत्रातून २१ लाखांचं विक्रमी उत्पन्न घेतलं आहे.कोथिंबीर या पिकाला मिनी स्प्रिंकलचा वापर करत या शेतकऱ्याने आधुनिकतेची जोड दिली आहे.

अनेक शेतकऱ्यांच्या शेतीत नुकसान झालं, मात्र या शेतकऱ्याने कोथिंबीरीच्या पिकातून २१ लाखांचं विक्रमी उत्पन्न घेतलं आहे. या शेतकऱ्याची सध्या संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा आहे. खंडाळ्यातील ५५ वर्षीय कैलास नळकांडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांच्या शेतीची सध्या एकच चर्चा आहे.याबाबत माहिती देताना कैलास नळकांडे यांनी सांगितलं की, साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोथिंबिरीच्या एका वानाची तब्बल साडेसहा एकरच्या क्षेत्रामध्ये पेरणी केली.

कोथिंबिरीच्या वाढीसाठी अनुकूल आणि पोषक वातावरण असल्याने करपा पडू नये म्हणून चांगली काळजी घेतली. त्यामुळे पारंपरिक शेती करत असताना आधुनिक शेतीची कास धरत सूक्ष्म फवारा सिंचन प्रणालीचा प्रभावीपणे वापर करत केला. अनेक ठिकाणी पालेभाज्यांचं मोठं नुकसान झाल्याने त्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे खंडाळ्यातील शेतकऱ्याच्या कोथिंबिरीला विक्रमी भाव मिळाला.

कोथिंबिरीला चांगला बाजार भाव मिळून २१ लाखाचं उत्पन्न मिळालं.या भागामध्ये ऊस शेती अधिक प्रमाणावर केली जाते. मात्र कैलास नळकांडे यांचं कुटुंब तरकारी भाजीपाला देखील करतं. मागच्या वर्षी देखील त्यांच्या पालेभाज्यांना चांगला भाव मिळून लाखात उत्पन्न मिळालं होतं. मात्र यंदाच्या वर्षी फक्त कोथिंबीर पिकालाच विक्रमी भाव मिळून २१ लाखांचं उत्पन्न मिळालं आहे.

कैलास नळकांडे हे प्रगतीशील शेतकरी असून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने आजही एकत्रित कुटुंब पद्धतीत उत्तम शेती करता येते, हे उदाहरणासहित दाखवून दिलं आहे. या शेतीतून आजच्या तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.प्रगतीशील शेतकरी कैलास नळकांडे यांच्या कुटुंबात अंकुश नळकांडे, डॉ. रोहिदास नळकांडे, आजोबा पोपटराव आणि युवा शेतकरी अमित नळकांडे, विशाल नळकांडे असा परिवार आहे.

एकत्र कुटुंब पद्धतीतून उत्तम शेती करता येते, हे या तीनही भावांनी दाखवून देत तरुण शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श निर्माण केला गेला आहे. त्यामुळे या परिसरामध्ये या कुटुंबाला ‘भाजीपाला एक्स्प्रेस’ म्हणूनही ओळख मिळू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *