तीनच महिन्यांपूर्वी लग्न झालं,पुण्यातली नोकरी सोडून गावी परतले अन् नवदांपत्यानी एकाच दोरीला लटकून  गळफास घेत जीवन संपवलं

तीनच महिन्यांपूर्वी लग्न झालं,पुण्यातली नोकरी सोडून गावी परतले अन् नवदांपत्यानी एकाच दोरीला लटकून गळफास घेत जीवन संपवलं

पुणे

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याने अहमदनगरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर या गावात हा प्रकार घडला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव वैभव आमले (वय 22) आणि स्नेहा आमले (वय 20) असे आहे. वैभव आणि स्नेहा यांचं अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, या दोघांनी अचानक आत्महत्येसारखे  टोकाचे पाऊल का उचलले, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

या नवविवाहीत दाम्पत्याने रविवारी संध्याकाळी साकुर येथील मुळा नदीच्या जवळील मांगमळीत गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती समजतात स्थानिक रहिवासी आणि साकुर गावचे ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेत सदर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली.

घारगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा केला असून सदर घटना कशामुळे घडली हे मात्र समजू शकले नाही.वैभव आणि स्नेहा आमले हे दोघेही पुण्यात नोकरी करत होते. काही दिवसांपूर्वीच दोघेही संगमनेरमधील आपल्या गावी परतले होते.  

त्यानंतर या दोघांनी एका झाडाला दोर बांधून एकत्रच गळफास घेतला. झाडाला लटकणारे या दोघांचे मृतदेह गावकऱ्यांच्या नजरेस पडल्यानंतर पोलिसांना याठिकाणी बोलवण्यात आले. याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

पोलिसांकडून सध्या आमले दाम्पत्याने आत्महत्या का केली, याचा तपास केला जात आहे. दोघांच्या मृतदेहाशेजारुन कोणतीही चिठ्ठी मिळाल्याची माहिती नाही. आमले दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाल्याने साकुर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *