पुणे
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेने शिरूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रेखा अर्जुन हिलाल (वय २८ ) असे दुर्देवी मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

या बाबत टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैदयकीय अधिकारी डॉ प्रियांका घुगे यांनी सांगितले की, येथे टाकळी हाजी केंद्रातील ४२ तर कवठे केंद्रातील ३८ अश्या ८० महीला कुंटुब नियोजन शस्त्रक्रीयेसाठी आल्या होत्या.

डॉ शिवाजी गजरे यांनी शस्त्रक्रीया केल्या. रेखा हिलाल ही कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रामधील आहे.त्यांची सर्व प्रकारची तपासणी केल्यानंतर त्यांना ऑप्रेशन टेबलवर घेतले. त्यांची तब्बेत एकदम ठणठणीत होती.

मात्र शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या घाबरल्या. त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना टेबलवरून खाली घेतले. पुढील उपचारासाठी शिरूरला पाठविण्यात आले.

मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.रेखा हिलाल यांना दोन मुले आहेत. विशेष म्हणजे रेखा हिलाल या कवठे येमाई आरोग्य केंद्रामधील असून तेथील ३८ महिला शस्त्रक्रियेसाठी रुग्नवाहिकेने टाकळी हाजी येथे आणण्यात आल्या होत्या.
मात्र कवठे येमाई येथील दोन पैकी एकही वैद्यकीय अधिकारी इकडे फिरकला सुद्धा नाही.सध्या तालुक्यात आरोग्य सेवा रामभरोसे असून असे किती लोकांचे प्राण घेणार आहात, असा संतप्त सवाल जनतेमधून केला जात आहे.
याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे.