मुंबई
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांच्या धमकी मिळाल्याच्या पत्रानंतर त्यांच्यात आणि सत्ताधाऱ्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यात आता मनसेने देखील उडी घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट खासदार संजय राऊत यांना त्यांच्या धमकीच्या आरोपानंतर पत्र लिहून डिवचले आहे.
संजय राऊत यांनी धमकी मिळाल्याचे पत्र मु़ंबई पोलीस आयुक्तांना दिले. राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील यासंदर्भात पत्र लिहिले आहे. तसेच राऊत पोलीस ठाण्यात देखील तक्रार दिली आहे. संजय राऊत यांच्या पत्रानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील पत्र लिहून डिवचले आहे. तसेच त्यांनी राऊत यांना मेडिटेशनचा सल्ला दिला आहे.
संदीप देशपांडे पत्रात म्हणाले की, ‘आदरणीय संजय राऊत साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र ! हे येडंxx मला का पत्र लिहतंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण विश्वास ठेवा वा ठेवू नका पण तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे.’आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात.
आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात.असे ते पुढे म्हणाले.’तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी.
माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल, असे देशपांडे पुढे म्हणाले.’आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल मनाला लावून घेतली आहे, ती पहिले आपल्या मनातून काढून टाका.
तुम्ही काही एकटेच ह्या ऱ्हासाला जबाबदार नाहीत,असे देशपांडे म्हणाले.’उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर पवार…पवार….असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच ! पटलं तर घ्या…नाही पटलं तर चू xx आहे असं म्हणून विसरून जा , आपला नम्र,संदीप देशपांडे, असे ते पुढे म्हणाले.