सातारा
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या विधानावरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या विधानाचा विरोध करताना अनेक नेत्यांनी राज्यपालांना महाराष्ट्रातून परत पाठवा, अशी मागणी केलीये.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा राज्यपालांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून रायगडावरून बोलताना त्यांनी राज्यपालांवर हल्लाबोल केलाय.छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असं बोलताना त्यांना लाज वाटली पाहिजे, असं म्हणत उदयनराजेंनी परखड शब्दांत राज्यपाल आणि भाजपाच्या संबंधित नेत्यांवर टीकास्र सोडलंय.
इतकंच नाही तर, त्याची (राज्यपाल कोश्यारी) उचलबांगडी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, ते जर इथे असते तर त्यांना टकमक टोकावरून ढकलून दिलं असतं, असा संताप देखील उदयनराजेंनी बोलताना व्यक्त केला आहे.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह उदयनराजेंनी भाजपलाही चांगलंच सुनावलं आहे. सर्वच पक्षांनी सोईनुसार महाराजांच्या नावाचा वापर केला आहे. यापुढे हे चालणार नाही म्हणत सर्वच राजकारण्यांची लाज काढली आहे.
उदयनराजे यांनी सर्वधर्म समभाव हा शिवाजी महाराजांनी अमलात आणला होता, तो फक्त नावालाच राहिल्याने उदयनराजे यांनी त्यावरून हल्लाबोल केला आहे. वेगवेगळी विधाने करून देशाचे तुकडे होतील, देश महासत्ता होणार नाही असेही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.