पुणे
लोकसभा २०२४ ची निवडणूक वर्षभरावर आली असतानाच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का रद्द करण्यात आला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी हा आता फक्त प्रादेशिक पक्षच म्हणून राहणार आहे. केवळ राष्ट्रवादी पक्षच नाही तर आणखी काही पक्षांवर देखील ही कारवाई केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आमि सीपीआय या पक्षांचा देखील राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आलेला आहे.एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी किमान चार राज्यांमध्ये पक्षाचे अस्तित्व असणे गरजेचे आहे. या सगळ्या नियमांमधून राष्ट्रवादी अपात्र ठरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला १० जानेवारी २००० साली राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. २०१४ पर्यंत त्यांचा हा दर्जा कायम होता. परंतू त्यानंतर पक्षाला निवडणूक आयोगाने नोटीसा पाठवल्या.इतर राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचा दर्जा कमी झाला होता. त्यामुळेच निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.
निवडणूक आयोगाने काढलेली ऑर्डर १८ पानांची आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत १६ टक्के मतं मिळाली होती. २८८ पैकी ५४ जागा जिंकल्या होत्या. या सगळ्या बाबींचा निवडणूक आयोगाने विचार करुन त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे.
एखाद्या पक्षाने ४ वेगवेगळ्या राज्यांतील लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान ६ टक्के मते आणि लोकसभेत किमान ४ जागा मिळवल्या पाहिजेत. कोणत्याही पक्षाला किमान चार किंवा अधिक राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळायला हवी.
हे निकष पूर्ण केल्यानंतरच एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिल्लीत देण्यात आलेलं कार्यलय देखील रिकामं करावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
कारण महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त हा एकमेव पक्ष होता, ज्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता. जो आता काढण्यात आला आहे.