पुणे
नरेंद्र मोदी यांनी तरी कुठे कुटुंब सांभाळले? त्यांची कौटुंबिक परिस्थिती तर अतिशय चिंताजनक आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी येथे पंतप्रधान मोदींवर टीका केली.पंतप्रधानांनी असे व्यक्तिगत बोलू नये, हे पथ्य त्यांनी पाळले नाही. पण, मीदेखील हे पथ्य पाळू नये, हे योग्य होणार नाही,’ असेही पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार या वयात स्वतःचे कुटुंब सांभाळू शकले नाहीत, ते महाराष्ट्र काय सांभाळणार, अशा शब्दांत टीका केली होती. त्या टीकेला पवार यांनी जळगावात पत्रकारांशी बोलताना प्रत्युत्तर दिले.रावेर मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी पवार शुक्रवारपासून जळगाव जिल्ह्यात आले आहेत.
शनिवारी सकाळी जळगावमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी पंतप्रधानांवर टीकास्र सोडले. पवार म्हणाले, ‘गेल्या वेळचे चित्र आणि आताचे चित्र वेगळे असून, त्यात जमीन-आसमानाचा फरक आहे. राज्यात काँग्रेसला १० ते १२ जागा मिळतील आणि आम्हाला ८ ते ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. सध्या माझे लक्ष दहा जागांवर आहे. या वेळी बदलास अनुकूल वातावरण दिसत आहे.’