पुणे
अतिवृष्टीमुळे यावर्षी खरीप हंगामात कापूस, तुर, सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे आस्मानी संकटाने बळिराजा हतबल झाला असतानाच पीक विमा कंपन्यांनी ३५, ५०, ९० रुपये नुकसान भरपाई दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
यवतमाळमधील एका शेतकऱ्याला ५२.९९ इतके पिकविम्याचे पैसे मिळाल्यानंतर त्याने पोलीस अधिक्षकांना पत्र लिहून थेट संरक्षणाची मागणी केली आहे. तसेच रक्कम घरी नेण्यासाठी चक्क बैलगाडीतून तिजोरीच घेऊन पोलीस कार्यालयावर धडक दिली.
यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील शिवणी गावातील दिलीप राठोड यांच्या शेतातील कापूस आणि सोयाबीन पिकांचे अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले. त्याचीच भरपाई म्हणून त्यांना सरकारकडून फक्त रु. ५२.९९ इतकी पिकविम्याची रक्कम मिळाली. या प्रकाराने संतापलेल्या शेतकऱ्याने यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून किमान सहा कर्मचार्यांचे पोलीस संरक्षण मागितले आहे.
पीक नुकसानीची भरपाई म्हणून त्यांना मिळालेल्या रकमेतून शेती कर्जाची परतफेड करतील. आणि काही पैसे त्याच्या आजारी पत्नीच्या उपचारासाठी खर्च करेन.
ही मोठी रक्कम मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे आणि मला पोलिस संरक्षणाची गरज आहे, असे पत्रामध्ये नमुद करत राठोड यांनी संताप व्यक्त केला आहे.
तसेच माझ्यासारख्या गरीब शेतकर्यांसाठी रु. ५२.९९ ही रक्कम ५० खोक्यांपेक्षा मोठी आहे. आता मला ती घरी नेण्याची काळजी वाटत आहे. घरी नेण्यासाठी मी माझी लोखंडी तिजोरी बैलगाडीतून जिल्हाधिकारी कार्यालयात आणली आहे.
पण मला भीती वाटते. साऱ्या जगाची व चोरट्यांची नजर माझ्या पीकविम्याच्या रुपये ५२.९९ कडे लागली आहे. त्यामुळे ही रक्कम घरी नेण्यासाठी मला सहा पोलिस कर्मचार्यांची आवश्यकता आहे,” असे पत्रात म्हटले आहे.