पुणे
शेतकऱ्यांचे प्रश्नांना सरकार गांभिर्याने घेत नसल्याची भावना व्यक्त करत बिबट्याचं भक्ष्य होण्यासाठी मंचरचे माजी सरपंचाने स्वतला बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंज-यात कैद करुन घेतले. या धक्कादायक प्रकारामुळे वनविभागासह प्रशासनाची चांगलीच धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजळे हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेल्या चार दिवसांपासुन अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मात्र प्रशासनासह राजकीय नेत्यानी आंदोलनाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच दत्ता गंजाळे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंज-यात स्वतला कैद करुन घेतले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार असाल तर मी स्वतःला बिबट्याच्या स्वाधीन करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दत्ता गांजळे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासन, तसेच वनविभाग अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले.
काय आहेत दत्ता गंजाळे यांच्या मागण्या?
• शेतीमालाला हमीभाव भेटला पाहीजे.
• अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द करा.
• बिबट्या प्रवण क्षेत्र असल्याने शेतीला दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात यावी.
• कांदा अनुदान द्यावे.
• निर्यात बंदी उठवण्यात यावी.
• दुधाला योग्य बाजारभाव मिळावा.
• अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी.
• पीक विमा मिळावा.
• शासनाने शेतीसाठी वाढवलेली पाणीपट्टी कमी करावी.