पुणे
इलेक्टोरल बाँड प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ज्या औषधांमुळे माणसे मारण्याची भीती होती, त्या बंदी घातलेल्या औषधी कंपनीने देणगी देताच कंपनीवरील बंदी हटवण्यात आली. माणसे मेले तरी चालेल, पण पक्षाच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजे, असे धोरण असलेल्या ‘मौत का सौदागरला’ पंतप्रधान म्हणून पुन्हा पाहायचे का? अशा शब्दात आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर ही त्यांनी निशाणा साधला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांच्या प्रचारासाठी नवीन मोंढा मैदानावर प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली.प्रचार सभेत बोलताना आंबेडकर म्हणाले, बोफोर्स प्रकरणात राजीव गांधी यांनी पैसे खाल्ले, अशी बदनामी करण्यात आली होती.
इलेक्टोरल बाँडवरून भाजपाला घेरण्याची काँग्रेसला संधी होती. कागदपत्र बाहेर देखील आले आहेत , मात्र काँग्रेस मूग गिळून गप्प बसली, काँग्रेसला पण पैसे मिळाल्यामुळे काँग्रेस गप्प आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली. मोदी हा माणूस बेभरवशाचा आहे. माझा शब्द म्हणजे गॅरंटी, व्यक्तीगत गॅरंटी कोणाला दिली? पत्नीला दिली का एकत्र राहण्याची? मोदी फसवायला निघाले आहेत.
तसेच आम्ही बाबासाहेब आले तरी, आम्ही घटना बदलू देणार नाहीत, असे मोदी भाषणात म्हणतात. गेलेली माणसे कधी येतात का? आम्ही विचारतो, तुम्ही घटना बदलणार आहेत का? ते सांगा. एका मुलाखतीत ते सांगतात, मला ४७ वर्ष आणखी या देशावर राज्य करायचे आहे. याचा अर्थ मरेपर्यंत पंतप्रधान होण्यासाठी ते सोय करत आहेत.
भांग पिलेला पंतप्रधान नको आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली.काँग्रेसचे दुर्दैव आहे, नेतृत्व असूनही मूग गिळून बसले आहेत. राहूल गांधी बुध्दीमान असून त्यांनी भाजपचा असिस्टंट ठेवला आहे, वाईट वाटते. ते ऐवढे पायी फिरले पण, त्यांच्या स्क्रीप रायटरने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले.
दोघांनीही लोकसभेला एकाही गरीब मराठा उमदेवार दिला नाही. त्यामुळे त्यांनी आमच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन केले.उद्या नरेंद्र मोदी यांची नांदेडमध्ये सभा होणार आहे. ही आनंदाची बाब आहे. २०१२च्या गुजरात निवडणुकीत सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना ‘मौत का सौदागर’ असा उल्लेख केला होता, तेव्हा काँग्रेसचा विरोध करण्यात आला होता.
बोफोर्स प्रकरणात ज्या प्रमाणे राजीव गांधी यांची बदनामी करण्यात आली, त्याचा बदला घेण्यासाठी काँग्रेसने शहरात ‘मौत का सौदागर’ असे बॅनर लावावे, असे आंबेडकर भाषणात म्हणाले. नांदेडमध्ये मॅच फिक्सिंग झाली. मॅच फिक्सिंग झाली असली तरी मतदार विरुद्ध मोदी अशी लढाई इथे दिसते असेही ते म्हणाले.