महसुल विभागाच्या दिरंगाईमुळे होतायत हाणामारी
पुरंदर
पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील धुळोबावस्तीतील लोकांना मांडकी गावात जाण्यासाठी मागील दोन वर्षापासून रस्ता नाही. या ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे यासाठी अर्जही केला होता. मात्र, त्यांच्या अर्जावर कोणतीही सुनावणी झाली नही किंवा त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले नाही. सौजन्याने रस्ता तयार करताना दोन गटात तुंबळ हणामारी झाली.
धुळोबावस्तीतील लोकांना मांडकी गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत लोकांच्या सहमतीने रस्ता करण्याचा निर्णय घेतला. रस्ता करणे सुरूही झाले. पण शेजारील शेतकऱ्याने हरकत घेतल्याने ग्रामस्थ आणि दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये काठीने आणि हाताने मारहाण करण्यात आली. तर यामध्ये तलवार देखील काढण्यात आली होती. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने ही तलवार काढून घेतली. या मारहाणीत काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र त्यामुळे मांडकी परिसरात लोकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.
याबाबत स्थानिक प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आज सोमवारी सकाळी धुळोबावस्ती येथील काही ग्रामस्थ या वस्तीवरील लोकांना मांडकी येथे येण्या जाण्यासाठी रस्ता बनवण्याचे काम करत होते. मात्र शेजारील मालकाने रस्ता माझ्या हद्दीतून जात आहे. माझी अजूनही जागा पलीकडे आहे. असे, म्हणत हा रस्त्यात करण्यावर हरकत घेतली आणि यातूनच बाचाबाची होऊन नंतर हाणामारी झाली. यामध्ये काही लोकांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. तर एक जण तलवार घेऊन आल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. मात्र हाणामारीत तलवारीचा वापर झाला नाही. काठी आणि हाताने ग्रामस्थांना मारहाण करण्यात आली. तर दुसऱ्या गटाकडून आपल्यालाही मारहाण केल्याचा दावा करण्यात येत आहे. घटनास्थळी जेजुरी पोलीस पोहचले असून पोलिसांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर दोन्ही गटाला वाल्हे पोलीस चौकीमध्ये येण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.
मागील दोन वर्षांपासून धुळोबाचीवस्तीसाठी असलेला रस्ता काही लोकांनी बंद केला होता. शेतातून जाणारा वहिवाटीचा रस्ता बंद केल्यानंतर लोकांनी हा रस्ता सर्वे नंबरच्या बांधाच्या बाजूने सबंधित मालकांच्या संमतीने काढण्याचा प्रयत्न केला. शेजारी असलेल्या जमीन मालकाने रस्ता माझ्या जागेतून जात आहे, म्हणत हरकत घेतली. लोकांनी त्याला ही जागा तुझ्या गटातील नसल्याची सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र यावरून लोकांमध्ये वाद झाला.
लोकांच्या मागणीकडे तहसीलदार आणि पुढाऱ्यांचे दुर्लक्ष : या रस्त्याची मागणी २०२१ मध्ये या ग्रामस्थांनी पुरंदरच्या तहसीलदारांकडे केली होती. मात्र महसूल विभागाने याकडे कोणतेच लक्ष दिले नाही. त्यामुळे हा वाद आता हाणामारी पर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर गावातील व तालुक्यातील पुढाऱ्यांकडे तसेच आमदार संजय जगताप यांच्याकडेही याबाबत विनवण्या करण्यात आल्या होत्या. त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. या वस्तीवर सुमारे २०० लोक राहण्यास असून पंचवीस ते तीस घरांच्या विस्तीच्या रस्त्याचा प्रश्न असल्याच ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.