पुणे
शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामाच्या गावाला आलेल्या दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील पाबळ येथे ही घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
आर्यन संतोष नवले (वय १३) व आयुष संतोष नवले (वय १०, दोघे, रा. राहू, ता. दौंड) अशी मृत्युमुखी पडलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, आर्यन नवले आणि आयुष नवले हे दोघे मंगळवारी (दि. २१) पाबळ येथील मामा सचिन भाऊसाहेब जाधव यांच्याकडे सुट्टीनिमित्त आले होते.
दुपारच्या सुमारास हे दोघे घराशेजारी असलेल्या भाऊसाहेब बापू जाधव यांच्या शेततळ्याजवळ खेळत खेळत गेले. दोघांनी कपडे काढून शेततळ्यात उडी मारली. मात्र, पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही शेततळ्यात बुडाले.ही घटना जवळच शेळ्या चारत असलेले त्यांचे आजोबा बाळासाहेब जाधव यांनी प्रत्यक्षपणे पाहिली आणि त्यांनी आजुबाजुला मदतीसाठी आवाज दिला. मदतीसाठी शेजारी असलेले कैलास जाधव आले. त्यांनी शेततळ्यात उडी मारून दोघांना बाहेर काढले.
त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.ते दोघेही दौंड तालुक्यातील राहु येथे राहणारे होते. यांच्या मृत्यूने पाबळ आणि राहू या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत शिक्रापूर पोलिसांकडून तपास केला जात आहे.