पुणे
22 मे रोजी पुण्यामध्ये दुध दराच्या प्रश्नावर रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही यात्रा काढली होती, त्यावरून दुग्धविकास मंत्र्यानी बैठक बोलावली आहे. देशी दारूच्या बाटलीची किंमत जेवढी आहे तेवढे पैसे आम्हाला नकोत फक्त एका क्वॉर्टरसाठी जेवढे पैसे लागतात तेवढे पैसे एक लिटर दुधाला द्या अशी आमची साधी मागणी आहे असे प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी इंदापुरात दिली आहे.
गाईच्या दुधाला प्रति लिटरला 75 रुपये भाव मिळाला पाहिजे तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये प्रति लिटरला भाव मिळाला पाहिजे आणि हे अवघड नाही. महागाई वगैरे काही वाढत नाही उलट शेतकऱ्याला जर भाव दिला तर महागाई निश्चित मनाने कमी होईल कारण महागाईची ज्यांना झळ पोहचते ती माणसं शेतात काम करायला येतात. शेतकरी मग त्यांना दोन पैसे देतो”, असाही सदाभाऊ खोत म्हणाले.
सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने रहावं. शेतकरी हा कष्टाळू आणि मायाळू आहे. त्या शेतकऱ्याला जर तुम्ही झिडकारलं तर शेतकऱ्याच्या हातात बळी नांगर आहे. हे राज्यकर्त्यांनी कधीही विसरू नये असा मौलिक सल्ला सदाभाऊ खोत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पोराला आणि शेतकऱ्याला आम्ही जागा करू कारण शेतकऱ्याच्या घामाचे पैसे आहेत. इथल्या साखर कारखानदारांने खऱ्या अर्थाने ते पैसे दिले नाहीत.
पैसे देणे गरजेचे आहे पेरणी हंगाम तोंडावर आलेला आहे. शेतकऱ्यांकडे अनेक समस्या आहेत. जर 30 जून पर्यंत पैसे दिले नाहीत तर एक जुलै रोजी साखर कारखान्याच्या समोर आम्ही धरणे आंदोलन करणार असा इशारा देखील सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिला.