ग्रामपंचायतीत भूकंप! सरपंचांवर आरोप करत उपसरपंचांसहित सर्व सदस्यांनी दिले राजीनामे,जिल्ह्यात खळबळ

ग्रामपंचायतीत भूकंप! सरपंचांवर आरोप करत उपसरपंचांसहित सर्व सदस्यांनी दिले राजीनामे,जिल्ह्यात खळबळ

पुणे

कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत असलेली रायगड जिल्ह्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध असलेली नेरळ ग्रामपंचायत आता एका नव्या वादाने पुन्हा एकदा जिल्ह्यात चर्चेत आली आहे. नेरळ ग्रामपंचायतमधील सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्यात गेली काही महिने धुसफूस सुरु होती. त्यानंतर आता थेट नेरळ ग्रामपंचायत सरपंच यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत उपसरपंचांसह सर्व सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

या प्रकाराने नेरळमध्ये चर्चेला उधाण आले आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.आर्थिक आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून नेरळ ग्रामपंचायत ओळखली जाते.मात्र गेली काही वर्ष विविध मुद्यांवरून ही ग्रामपंचायत जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. कधी रिकामी तिजोरी, कामगारांचे काम बंद आंदोलन, स्वच्छ गाव मिशनला हरताळ, कामगारांना पगार नसल्याने कामगाराची आत्महत्या तर कधी नळातून साप अशा विविध मुद्द्यातून नेरळ ग्रामपंचायतीची प्रतिमा मलिन होत आहे.

अशात काही महिन्यांवर नेरळ ग्रामपंचायतीची निवडणूक येऊन ठेपली असताना ग्रामपंचायतीत मोठा भूकंप घडला आहे. गेले काही दिवस सरपंच उषा पारधी यांच्यासह इतर १५ सदस्य यांच्यात धुसफूस सुरु होती. त्याचा उद्रेक होत आज दिनांक १८ जुलै रोजी सरपंच उषा पारधी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांच्यात आघाडीतील उपसरपंच व सदस्य यांनी राजीनामा दिला आहे. तर त्यासह इतर गटातील सदस्य यांनी देखील राजीनामा सरपंच उषा पारधी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

अचानक घडलेल्या या राजीनामा नाट्याने नेरळकर गोंधळात पडले आहेतया राजीनाम्यानंतर सदस्यांनी पत्रकार परिषद घेत या आपली बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी उपसरपंच मंगेश म्हसकर यांनी सरपंच उषा पारधी यांच्या भष्ट्र व मनमानी कारभारामुळे आपण राजीनामा दिल्याचे सांगितले. उषा पारधी या कुठल्याही कामासाठी प्रतिसाद देत नसल्याने नेरळकरांसाठी आम्हाला काम करता येत नाही. त्यामुळे आम्ही राजाईनामा देत आहोत आम्हाला नेरळकरांनी माफ करावं म्हणत त्यांनी माफी मागितली आहे.उप सरपंच मंगेश म्हसकर हे सीनियर आहेत व सदस्य हे सुज्ञ आहेत तरी देखील गावाच्या समस्या का सुटत नाही.

सरपंच पारधी या सदस्यांच्या सुचनेकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे गावाची परिस्थिती भयाण झाली आहे. सरपंच यांचे पती हे ग्राम पंचायतीचे कर्मचारी आहेत मात्र त्यांनी गेल्या तीन वर्षात कोणत्या विभागात काम केले आहे, असा सवाल म्हसकर यांनी उपस्थित केला .आरोग्य विभागातील कर्मचारी यांची इतर विभागात भरती केल्याने व आरोग्य कर्मचारी यांची संख्या कमी होत असल्याने या संदर्भात मासिक सभेत वारंवार प्रश्न उपस्थित केले मात्र आरोग्य विषयी प्रश्नाकडे ही सरपंच यांनी दुर्लक्ष केल्याने नेरळ मध्ये कचऱ्याचे ढीग साचले जात आहेत. यासह सरपंच यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पाणी बिल बेकायदेशीररीत्या कमी करून दिली आहेत. यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचे म्हसकर यांनी म्हटले आहे.

तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी हे थक्कीत वेतन मिळण्यासाठी आंदोलनाला बसले असताना सरपंच यांनी पदाचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे नेरळ ग्राम पंचायत कार्यालय हे रात्री ११ वाजे पर्यंत सुरू ठेवत १५ वित्त आयोग निधीतून सुमारे १४ लाख रूपये हे वस्तू खरेदीसाठी काढली मात्र वस्तू खरेदी केल्या नव्हत्या.

माझ्यावर केलेले आरोप यांच्यात काही तथ्य नाही. आज ग्रामपंचायतमध्ये आल्यावर मला हा प्रकार समजला. पण ठीक आहे जे आरोप केले ते त्यांनी सिद्ध करावे. मी प्रामाणिकपणे आजवर माझे काम केले. प्रत्येक सदस्याला माझ्यापरीने मी मदतच केली आहे. तरी माझ्यावर हा राग का ? हे मला समजले नाही. कर्मचारी आंदोलन काळात काही महत्वाच्या गोष्टी आलम, टीसीएल आदी गोष्टी तात्काळ हव्या होत्या. त्यासाठी मी पैसे दिले तर चुकलं काय ? माझ्या पतीवर कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला आहे, पण त्यांनी कुठल्या कामात हस्तक्षेप केला, कुठल्या कागदावर सही केली का हे सिद्ध करावं:उषा पारधी, सरपंच,नेरळ ग्रामपंचायत

या प्रकारावर आम्ही आवाज उठवल्यावर त्यांनी नंतर वस्तू खरेदी केल्या. तर नेरळला आलेली वाढीव पाणी योजना कोणामुळे संथ गतीने सुरु आहेत म्हसकर यांनी सरपंच उषा पारधी यांच्यावर निशाणा साधला आहे. या पत्रकार परिषदेला उपसरपंच मंगेश म्हसकर, सदस्य शिवली पोतदार, श्रद्धा कराळे, उमा खडे, गीतांजली देशमुख, जयश्री मानकामे, संतोष शिंगाडे, शंकर घोडविंदे, राजेंद्र लोभी भाजप तालुकाध्यक्ष राजेश भगत, भाजप महिला तालुकाप्रमुख नम्रता कांदळगावकर, नितीन कांदळगावकर, शेकाप तालुका चिटणीस शरीर राणे आदी यावेळी उपस्थित होते.

२०१९ मध्ये शिवसेनेची ग्रामपंचायतीवर सत्ता होती. मात्र नंतर कोविड काळात जून २०२१ मध्ये थेट सरपंच रावजी शिंगवा यांचं निधन झालं. आणि सरपंच म्हणून उषा पारधी यांची निवड झाली. मात्र त्यांनी विरोधी सदस्य म्हणून आजवर आम्हाला त्रास देण्याचं काम केलं. आमची काम होत नसल्याने आम्ही वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. आज जे भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत ते देखील इतके दिवस सरपंच यांच्या सोबत होते. मात्र त्यांना आजच भ्रष्टाचार का दिसला ?प्रथमेश मोरे, सदस्य नेरळ ग्रामपंचायत शिवसेना ठाकरे गट

दरम्यान नेरळ ग्रामपंचायतमध्ये आज घडलेल्या राजीनामा नाट्यावर नेरळमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून सर्व सदस्यांनी सरपंच उषा पारधी यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. मात्र पारधी यांनी देखील आरोप सिद्ध करा म्हणत प्रतीवार केला आहे. तेव्हा आता नेरळ ग्रामपंचायत बरखास्त होणार कि यातही पुन्हा जुळवाजुळव होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *