कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील जुने पारगावमध्ये घडलेल्या एका घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. दोन जिवलग मित्रांनी एकचवेळी आणि एकाच ठिकाणी आपलं आयुष्य संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आयुष्य संपवल्याचं बोललं जात आहे.
विनायक शिवाजी पाटील (वय ४० ) आणि बाबासो हिंदुराव मोरे (वय ४५ ) अशी या आत्महत्या केलेल्या जिवलग मित्रांची नावं आहेत. एकाच झाडाला गळफास घेऊन या जिवलग मित्रांनी आत्महत्या केली. हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव येथील बिरदेव वसाह येथील हे मित्र होते. नवे पारगाव येथील तात्यासाहेब कोरे सैनिकी शाळेच्या मागे असलेल्या झाडला त्यांनी गळफास घेतला.विनायक पाटील आणि बाबासो हिंदुराव मोरे हे दोघे चांगले मित्र होते.
विशेष म्हणजे आज सकाळीपासून दोघं एकत्रच फिरत होते. पण दुपारी हे दोघ जण मोटरसायकलवरून सैनिक शाळेच्या मागे गेले. आणि तिथे असलेल्या एका झाडाला गळफास लावून घेऊन दोघांनी आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेचं वृत्त वाऱ्यासारखं गावभर पसरलं आणि गावकऱ्यांनी गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.
जिवलग मित्रांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. या दोन मित्रांमध्ये विनायक पाटील यांचा ट्रक व्यवसाय आहे.
तर बाबासो मोरे हे शेतकरी होते. विनायक पाटीलच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी आणि एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे तर बाबासो मोरेच्या पश्चात आई–वडील, पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. जिवलग मित्र सोबत जग सोडून गेले. पण त्यांची मुलं वडिलांना पोरकी झाली.