पुणे
जमिनीच्या वादातून चुलत्याने पुतण्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक जालना जिल्ह्यात घडली आहे. भोकरदन तालुक्यातील जानेफळ मिसळ गावात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अंबादास बाबुराव मिसाळ असे हत्या करण्यात आलेल्या या तरुणाचे नाव आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, भोकरदन तालुक्यातील जानेफळ मिसळ गावातील अंबादास बाबुराव मिसाळ व चुलता शिवाजी मिसाळ यांच्यामध्ये जमिनीच्या वाटणीतून वाद सुरू होता.
तीन- ते चार वर्षांपासून त्यांच्यामध्ये अधून- मधून याच कारणातून भांडणे होतं होती. आज सकाळीसुद्धा दोघांचा जमिनीच्या वाटण्यावरून शाब्दिक वाद झाला होता.
या वादानंतर अंबादास हा दुपारच्या सुमारास आपल्या शेतात असलेल्या झाडाखाली झोपला होता.
यावेळी सकाळच्या भांडणाचा वाद मनात घेवून शिवाजी मिसाळ यांनी अंबादासच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी पंचनामा करत शिवाजी मिसाळ याच्यासह एका विरुद्ध गुन्हा दाखल करून दोन आरोपीना अटक केली आहे. या घटनेने जानेफळ मिसाळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.