पुणे
आज सत्तेचा गैरवापर केला जात आहे.राज्याच्या प्रमुखांनी दहशत निर्माण केली आहे. निवडणुका महाराष्ट्रामध्ये आल्या आहेत, पण आता कोणी फोन करतो, कोणी धमक्या देतो सध्या हे महाराष्ट्रात सुरू आहे, पण त्यांना हे माहीत नाही, तुम्ही कितीही दम दिला व धमक्या दिल्या,तरीही त्याला भीक न घालणारी ही अवलाद आहे. ही अवलाद कुणाही समोर झुकणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
शिवसेनेच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा बारामतीत पार पाडला. यावेळी ते बोलत होते.या मेळाव्यास शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार सचिन आहेर, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह शिवसेनेचे इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी व खडकवासला या तालुक्यातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ठिकाणी भाषण ऐकले.
ते म्हणाले, मी दोन पक्ष फोडून सत्तेवर आलो म्हणाले. आता यांचे काय कर्तृत्व? त्यांनी काय काम केले? पक्ष फोडण्याचे काम केले! कुणाचे घर फोडण्याचे काम केले. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र फोडण्याचे काम केले.
फडणवीसांवर टीका करताना शरद पवार पुढे म्हणाले,त्यांनी पक्ष फोडला असेल. पण त्यांना हे माहीत नाही की, काही लोक गेले असतील, फोडले असतील, मात्र हजारो नाही तर लाखोंच्या संख्येने शिवसैनिक आहेत आणि ते मात्र जागेवरच आहेत. हे शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा ऐक्याने महाराष्ट्र चालवू शकतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत.