पुणे
मावळ तालुक्यामधून एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आली आहे. एका कार्यक्रमावरुन घरी जात असताना भरधाव वेगात असलेल्या कारने दुचाकीवरील पती-पत्नीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यामध्ये या दोघांचाही मृत्यू झाला आहे.पुण्यातील मावळ तालुक्यातील नायगाव येथे राहणाऱ्या दाम्पत्याचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.गणेश दत्तात्रय चोपडे आणि अर्चना गणेश चोपडे (रा. नायगाव) असं या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमुळे नायगाव परिसरात एकच शोककळा पसरली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्रीच्या सुमारास एक कार्यक्रम उरकून हे दाम्पत्य नायगाव येथील आपल्या घरी जात होते. मात्र, रात्रीच्या वेळी रस्त्याने भरधाव वेगात असलेल्या एका चारचाकी वाहनाने या दाम्पत्याला पाठीमागून जोरात धडक दिली.
या अपघातामध्ये हे दाम्पत्य गंभीर जखमी होऊन त्यामध्ये या दोघांचाही मृत्यू झाला आहे.या दाम्पत्याच्या पश्चात दोन मुलं आहेत. या दोघांचा आधार गेल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण नायगावावर शोककळा पसरली आहे. सध्या नवरात्रीचे दिवस असून त्यामुळे सर्वत्र दांडिया खेळण्याचे धामधूम सुरू आहे.
अशातच ही दुःखद घटना घडल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. अनियंत्रितपणे वाहने चालवून नागरिकांना उडवणाऱ्या अशा गाडी चालकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.