नाशिक
कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र सध्या कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. यामुळे शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहत अग्निडाग कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.
येवल्याच्या नगरसुल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी थेट आपल्या रक्ताने पत्र लिहिले असून शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न असतांना त्याला कांदा रडवतोय. त्याचा उत्पादन खर्च वसूल होत नसून केंद्रातील भाजपाचे धोरण शेतकरी विरोधी आहे. आपणही शेतकऱ्याचे पुत्र असून आपण या विरोधात आवाज उठवायला पाहिजे होता. मात्र आपणही गप्प का? असा प्रश्न त्याने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात विचारला.
आपण काही करु शकत नसाल तरी मी ठेवलेल्या कांदा अग्नीडाग कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे; असे आग्रहाचे निमंत्रण त्याने रक्ताने लिहिलेल्या पत्रात केले आहे.कांद्याला भाव मिळत नसल्याने कृष्णा डोंगरे याने येत्या सहा मार्चला आपल्या शेतातील कांद्याला अग्निडाग देण्याचा समारंभाचे आयोजन केले आहे. त्याच्या जाहीर निमंत्रण पत्रिका त्याने छापल्या असून त्या सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत आहेत.
विशेष म्हणजे काही वर्षा पुर्वी याच कांदा प्रश्नावर कृष्णा याने शेतातील कांदा जाळला होता. त्यावेळी मोठी चर्चा माध्यमांमधून झाल्याने विरोधी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट नगरसुल येथे धाव घेत कृष्णा डोंगरे यांची भेट घेतली होती.