पुणे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दि.२८ रोजी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर दि. २९ रोजी झालेल्या अंत्यसंस्कारासाठी बारामती येथे महाराष्ट्रातुन मोठ्या प्रमाणात नेते, नागरिक, कार्यकर्ते व महिला भगिनींची तुफान गर्दी झाली होती.या गर्दीचा गैरफायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी उपस्थित नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या व रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली. या घटनेत वेगवेगळ्या नागरिक व साक्षीदार यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या तसेच रोख रक्कम असा अंदाजे २० लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा तक्रारदारांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार फिर्यादी रणजीत बाळासाहेब जाधव तसेच साक्षीदार विश्वजीत अनिल तुपे, अंकुश शांताराम दिघे, प्रशांत लक्ष्मण सपकाळ, विकास कैलास भागवत, रणजीत मधुकर भोंगळे व इतर यांचा सोन्याच्या चैन रोख रक्कम असा अंदाजे २० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
चोरी करणारे सात जण कोण?
गुन्हा दाखल होताच बारामती पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान राजकुमार बाबुराव आठवले (रा.तलवाडा ता.गेवराई, जि. बीड), मोहम्मद अनीस मोहम्मद युनूस (रा. गवळीपुरा, डिग्रज, यवतमाळ), एजाज भगु मीरावले (रा.गवळीपुरा, डिग्रज, यवतमाळ), मोहम्मद सादिक मोहम्मद गफार (रा. मोतीनगर, डिग्रज, यवतमाळ), बाळू उर्फ दत्तात्रय बबन धोत्रे (रा. इंदिरानगर, पाथर्डी, जि. अहिल्यानगर सध्या रा. पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे), तुषार कैलास मासाळ (रा.कोरडगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर), नितीन अंकुश गायकवाड (रा.शिक्षक कॉलनी, ता. बीड,जि.बीड) आदी आरोपींना अटक आली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलीस तपास सुरू असून, आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे.

