पुणे
काही झाले तरी उद्याच्या निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता हातात घ्यायची. महाराष्ट्राची सत्ता हातात घेतल्यानंतर ऊसाला भाव कसा मिळत नाही. दुधाचे पैसे कसे मिळत नाहीत, हे सगळे बघतो, असे बघण्याचा अनुभव मला फार आहे. आज देशात आणि राज्यात ५६ वर्ष सतत निवडून येणारा कोण मायेचा पूत आहे का दाखवा? असे म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बारामतीत जोरदार बॅटिंग केली.
शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील निंबूत, वडगाव निंबाळकर, कोराळे, माळेगाव या ठिकाणी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यासह केंद्र सरकारवर निशाणा साधलापुढे बोलताना पवार म्हणाले की, लोकसभेला तुम्ही जसे काम केले.
तसेच काम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत करा. कोणी सांगेल,कोणी रागवेल, कोणी दम देईल. ते येतील जातील फिरून जातील. या वेळेला कोणी काही म्हटले तरी तुम्ही जसे बटन दाबले, तसेच नेमके बटन उद्याच्या निवडणुकीतही दाबा.आपल्याला देशाचे आणि राज्याचे चित्र बदलायचे आहे.
देशात आणि राज्यात निवडणुका लढवताना शिवसेना, काँग्रेसला सोबत घेतले. महाराष्ट्रात ४८ जागांपैकी ३१ जागा निवडून आल्या. आणि राष्ट्रवादीने दहा पैकी आठ खासदार निवडून आणले. याचा अर्थ हाच आहे की, लोकांना बदल हवा आहे. आणि तो बदल झाला तर तुमचा संसार सुधारेल, असेही पवार म्हणाले.
मी मुख्यमंत्री झालो त्या वेळेला माझ्यासमोर प्रश्न आला की, शेतकऱ्यांच्या डोक्यावर जुने कर्ज फार आहे. मी अभ्यास केला. कर्ज माफ केले तर काय होईल आणि ७५ हजार कोटींची कर्जमाफी केली.
आम्ही शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे ओझ वजन कमी केले. सध्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे ओझ कमी केले पाहिजे. यासाठी सत्तेचा वापर होत नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात पत्र दिले आहे.
याबाबत ते काही तरी निर्णय घेतील अशी अपेक्षा असल्याचे पवारांनी सांगितले. जर त्यांनी लक्ष घेतले नाही तर जनतेच्या माध्यमातून तसा निर्णय घ्यायला लावायचे हे आम्हाला माहिती असल्याचे पवार म्हणाले.