पुणे
आम्हाला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना अशी स्वप्न पडतात. त्यांना सत्तेचा आजार झाला होता. फडणवीस यांना गांभीर्याने घेऊ नका. फडणवीस हे राजकारणातील कच्च मडकं आहेत. अत्यंत कच्च मडकं आहे. कॉपी करून पास होणाऱ्या लोकांसारखे ते आहेत. तसं हे मडकं आहे, असा जोरदार हल्ला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चढवला आहे.
आम्ही नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती आणि आम्ही हरलो. हे फडणवीस यांना माहीत नसेल. ते तेव्हा राजकारणात फार नव्हते, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे स्वत:चं असं काही नाही. लोकं त्यांना मतं देणार नाहीत. महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकत आहे. अजित पवार गट एकही जागा जिंकणार नाही. शिंदे गटालाही एकही जागा मिळणार नाही. आमचे कार्यकर्ते तनमनधनाने काम करत आहेत.
अजित पवार यांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्या आहेत. ते मोकळे झाले आहेत. मुख्यमंत्र्यांची धावपळ सुरू आहे. त्यांची अखेरची तडफड सुरू आहे. त्यांचं बॅलन्स शिल्लक नाही. डिपॉझिट जाईल, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.